शांता शेळके यांचे ” सांगावेसे वाटले, म्हणून ” हे पुस्तक हातात आहे. शीर्षका इतकेच पुस्तक ही मस्त आहे. अर्थात मी शांताबाई बद्दल काय लिहिणार? पण त्यातील ३–४ कथा वाचल्यावर ,मला पण सांगावेसे वाटले, म्हणून…..
फसवी दारे मध्ये त्या म्हणतात , इजिप्तच्या थडग्याना फसवी दारे असतात जेणे करून थडग्याच्या अंतरंगात कुणाला प्रवेश मिळू नए. देवगिरी च्या किल्याला पण अशीच शत्रूची दिशाभूल करणारी फसवी दारे आहेत . शांताबाईनी अशा दारांची तुलना माणसांशी केली आहे. आपल्या आसपास अशी फसवी दारे असणारी माणसे बऱ्याच वेळा भेटत असतात. भलेपणाचे , औदार्याचे, सौज्यनाचे अणि इतर बरेच चांगले गुण त्यांच्या स्वभावात दिसत असतात ,आणि मग एखाद्या प्रसंगातून त्यांच्या कठोरपणाचे , व्यवहारी पणाचे दर्शन आपणास होते.
आपल्या सर्वांना अशी फसवी माणसे पदोपदी भेटत असतील कदाचित. अशी माणसे बाकी सगळ सांगतील , म्हणजे शेजाऱ्या बद्दल बोलतील , गावी कोण गेले, कोणाचे लग्न ठरले ,अमका परदेशी जाणार , तमक्याला दहावीत किती मिळाले इ . सगळं सगळ……पण मी दोन दिवसांनी स्वतः परदेशी जाणार हे सांगणार नाही, अगदी समोरच्याला माहित असले तरी सुद्धा.. आणि गंमत म्हणजे समोरच्याला खरे तर काहीच फरक पडत नाही. अशी माणसे घराबाहेर भेटली तर ठीक आहे, पण अशा निकटवर्तियांचा त्रास होतो .
थडग्याला असणाऱ्या दारांना कारण आहे. थडग्यात मृत व्यक्ति सोबत , सुगंधी द्रव्ये , अलंकार इ पुरले जात. त्याना इहलोकिचे वैभव मरणानंतर मिळावे अशी त्या मागची भावना. म्हणून संपत्तीच्या रक्षणासाठी केलेल्या फसव्या दारांची योजना निदान समजू शकतो.
पण समोरचा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो आहे , त्याची आपण फसवणूक करतो आहोत ह्याची जरा पण ह्या माणसाला खंत वाटू नए ? आणि स्वतःला अश्या फसवणुकीचा अनुभव आल्यावर त्यांना राग का येतो ? असल्या लोकांचे अंतरंग जाणुन घेण्यापेक्षा, त्यांना आपल्या मनातून हद्दपार करावे. आणि त्यांना त्यांच्या खोटेपणाची कधी तरी लाज वाटू दे अशी प्रार्थना करावी !!!!!